मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कोरोना कालखंडानंतर प्रथमच दोन वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुरबाड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये लेझीमवर ठेका धरीत सजविलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी किशोर व पोटगाव येथील शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश प्रदान करण्यात आला.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच आज नव्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यातील 1 हजार 328 शाळांमध्ये प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ठरवले होते. त्यानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका व उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाची भेट दिली गेली.
मुरबाड तालुक्यातील किशोर व पोटगाव, देवगाव, येथील शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांची उपस्थिती होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक देण्याबरोबरच बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात ग्रामस्थांचाही लक्षणीय सहभाग होता. या वेळी मोहन भावार्थे, रमेश तुंगार, मधुकर एगडे, विठ्ठल भोईर, किसन विशे यांचीही उपस्थिती होती. तर तालुक्यातील दुर्गम भागात आमदार किसन कथोरे यांनी काही शाळात उपस्थित राहून विदयार्थी वर्गाचे स्वागत केले. मुरबाड मध्येही वाद्य गजरात विदयार्थी वर्गाने पहिल्या दिवशी शाळेत उपस्थीती दर्शविली. कोरोनामुळे गेलीं दोन वर्ष विदयार्थी आँनलाईन शिक्षण घेत होते. यात ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला फार मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र आता शाळा पुर्ववत सूरू होत असल्याने विदयार्थी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.