पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्री धर लाड) : ज्यांना आरक्षण मुक्त देश बनवायचा आहे ते ओबीसींचे कैवारी असल्याचे भासवत असताना आपण कुठवर बळी पडायचे याचा विचार करण्याची वेळ आली असून ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा.हरी नरके यांनी आपले विचार व्यक्त केले. ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पश्चिम विदर्भ विभागीय प्रबोधन शिबिरात बोलत होते. अकोला शहरातील संत तुकाराम चौकातील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित या शिबीराचे उदघाटन आ.अमोल मिटकरी यांच्या हस्ते, तर समता परिषद प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या प्रसंगी रवि सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा.नरके यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, लेखक उत्तम कांबळे यांनी एक दिवसीय कार्यशाळेला विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.नरके म्हणाले, “ओबीसी आरक्षण आणि ना.छगन भुजबळ यांचे योगदान” यावर बोलताना प्रा.नरके यांनी राज्यातील ओबीसी आरक्षण लढे आणि संघर्षाचा आढावा घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली. वाशिमच्या विकास गवळी यांनी जिल्हा परिषद बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याने देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्यात जमा आहे. माध्यमांनी चुकीचे वार्तांकन करून लोकांचा संभ्रम वाढविला आहे ,सुप्रीम कोर्टाचे निकाल देशाला लागू असतात त्यामुळे आगामी काळात जसजशा पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्यात ओबीसी आरक्षण नसेल.”
सकाळच्या सत्रात रावसाहेब कसबे यांनी देशातील ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकत ओबीसी समूहाची सांस्कृतिक फसवणूक वैदिक व्यवस्था आजही कशी कार्यरत आहे हे सांगितले, तर समारोप सत्रात ज्येष्ठ संपादक, लेखक उत्तम कांबळे यांनी शाहू महाराज आणि आरक्षण या विषयावर मांडणी करताना शाहू, फुले आंबेडकरांना समजून घेतल्याशिवाय आरक्षण समजू शकत नसल्याचे सांगितले. आरक्षण मागणे म्हणजे जाती अंताचा विचार स्वीकारणे होय, गुलामीच्या साखळ्या तोडण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे, “जो समाज प्रश्न जागे ठेवतो आणि त्याच्यासाठी लढत राहतो त्याची प्रगती होते” असे कांबळे म्हणाले.
सुप्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज, प्रा.डॉ. संतोष हुशे, हरिभाऊ भदे, बळीराम सिरस्कार, प्रा.तुकाराम बिडकर ओबीसी नेते विजय कौशल, विलास वखरे, अनिल शिंदे, गजानन वाघमारे, सुभाष सातव, गणेश खारकर, यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शिबिरासाठी विभागीय अध्यक्ष अरविंद गाभणे, विभागीय संघटक गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, प्रा. श्रीराम पालकर, विजय उजवणे, उमेश मसने, प्राचार्य किशन मेहरे, गजानन म्हैसने, ज्योती भवाने, कल्पना गवारगुरु, माया ईरतरकर, दीपमाला खाडे, सुष्मा कावरे, रामदास खंडारे, सपना राऊत, अनिल मालगे, बाळकृष्ण काळपांडे, नेहा राऊत, श्रीकृष्ण बोळे, सदानंद भुसकुटे, संजय तायडे, यांनी परिश्रम घेतले.