न्हावरे,शिरूर : तालुक्यातील कोकडेवाडी येथे काल दि. ३ ला सायंकाळी महिला व ग्रामस्थांनी न्हावरे ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करणारा पाण्याचा टँकर आडवून आंदोलन केले.
कोकडेवाडी गावठाणात सुमारे आठ दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही.त्यामुळेे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला,लहान मुले व ग्रामस्थ यांना वणवण करावी लागत आहे. यामुळेच संतप्त होऊन महिला व ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर अडवून आंदोलन केले.
दरम्यान माजी उपसरपंच युवराज निंबाळकर यांनी मध्यस्थी करुन आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या महिला व ग्रामस्थांची समजूत घातली व आज दि. ४ ला सकाळी पहिल्यांदा पाण्याने भरलेला टँकर कोकडेवाडी येथे येईल त्यानंतर दुसर्या ठिकाणी पाण्याचे वितरण होईल असे सांगितले. त्यानंतर आडवण्यात आलेला पाण्याचा टँकर ग्रामस्थांनी सोडून दिला.
पाणी वाटपाबाबत ग्रामपंचायतीचे नियोजन शून्य असून, टँकरची संख्याही कमी आहे. त्यामुळे पाण्याचे वाटप वेळेवर होत नाही.असा आरोप कोकडेवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्यासाठी आमदार बाबुराव पाचर्णे व तहसीलदारांकडे मागणी केली आहे.असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
परंतू न्हावरे गाव आणि वाड्या वस्त्यांसाठी स्वतंत्र.टँकरची व्यवस्था करण्यात यावी व पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे गाव, वाड्या-वस्त्यानुसार योग्य नियोजन करावे अशी मागणी होत आहे.
– योगेश मारणे,प्रतिनिधी,(सा.समाजशील,न्हावरे)