शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून लागवडी पूर्वीच विक्रेत्यांना तंबी
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची बोगस बी-बियाणे व खते यांची विक्री होऊन फसवणुक होवू नये यासाठी मुरबाड तालुका काँग्रेस आक्रमक झाली आहे. बोगस बी-बियाणे व खते यांच्या विक्री संदर्भात आळा घालण्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संध्या कदम, महिला शहराध्यक्ष शुभांगी भराडे, तालुकासचिव भगवान तारमळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुरबाड तालुक्यांतील काही दुकानदार हे जास्तीच्या नफ्यासाठी बोगस बियाणे व खते विक्रीसाठी ठेवणार असल्याची चर्चा शेतकरी वर्गामध्ये असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले. कमी प्रमाणामध्ये बियाणांची पेरणी करुन जास्तीचे उत्पादन देणार अश्या खोट्या अफवांना बळी पडुन शेतकरी पेरणी करतो नंतर बोगस बियाणेमुळे कमीप्रमाणात पिक येते अशी प्रतिक्रिया तुकाराम ठाकरे यांनी दिली. जर भविष्यामध्ये संपुर्ण तालुक्यातील एकही शेतकऱ्याची बोगस बियाणे अथवा खते याविषयात जर फसवणुक झाली तर त्याला जबाबदार म्हणुन तालुका कृषी अधिकारी मुरबाड तालुका या समजुन काँग्रेस कमिटीच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन संध्या कदम यांनी केले.