मुरबाड तालुक्यातील साखरमाची येथील 22 आदिवासी कुटुंबांच्या कायम पुनर्वसन उपोषण प्रसंगी डागली तोफ
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात २०१४ पासुन तात्पुरते पुनर्वसन केलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालक्यातील साखरमाची विस्थापीत कुटुंबाचे कायम पुनर्वसन शासनाने करावे व तात्पुरत्या पुनर्वसनासाठी मिळालेल्या पैशाची फसवणुक करणाऱ्या भाजप तालुका सरचिटणीस व ठेकेदार सुरेश बांगर यांच्यावर फसवणुक व अनुसचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, साखरमाची करांची हडप केलेली 42 लाख 80 हजार रूपये परत मिळावे व मुरबाड जवळील लांबाची वाडी येथे कायम स्वरुपी पुनर्वसन करावे या मागणीसाठी मुरबाड तहसील कार्यालयाबाहेर प्रहार जनशक्ती पक्षांचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, साखरमाची विस्थापित कल्पेश येंदे, पुंडलिक येंदे, सावळाराम येन्दे, अरुण येंदे व नितीन येंदे लाक्षणिक उपोषण केले. या वेळीं या उपोषणाला पाठिंबा देत उपस्थित असलेले भाजपचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी सरकारला घरचा आहेर देत भ्रष्टाचार रोखण्यापेक्षा भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असून 22 आदिवासी विस्थापित कुटुंबाची फसवणुक करणाऱ्या कार्यकर्त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून या 22 कुटुंबांना न्याय देऊन त्यांचे कायम पुनर्वसन करावी अशी मागणी त्यांनी केली. तर राज्यात मुंडे – महाजन यांची भाजप राहिली नसून, बांडगुळांची भाजप असल्याची तोफ डागली यामुळे माजी आमदार दिगंबर विशे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
या उपोषणाची वन विभागाने तात्काळ दखल घेत मुरबाड RFO दर्शना पाटील, SFO देसाई मॅडम यानी निवेदन स्वीकारून कारवाईचे व कायम स्वरुपी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र या मुळे तालुक्यांतील भाजप चे पदाधिकारी असलेले सुरेश बांगर यांच्या अडचणी वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, 2014 साली माळीण दुर्घटना घडल्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील साखरमाची येथील 20 कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन मुरबाड तालुक्यांत करण्यात आले. या पुनर्वसनासाठी शासनाने 20 कुटुंबांना 43 लाख 82 हजार 974 रुपयाचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले. मात्र वनविभागाने कुठलाही कागदोपत्री आदेश दिला नसताना सुरेश बांगर यांनी साजई गावातील सर्व्हे नंबर 38 मध्ये बांधकम करून या कामाचे 42 लाख 80 हजार रूपये आपल्या व इतर दोन खात्यात वर्ग केल्याने त्यांच्यावर ही रक्कम हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळें अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आजचे उपोषण करण्यात आले. या आरोपाचे सुरेश बांगर यांनी खंडण केले आहे. माञ शासनाने आमचे कायम पुनर्वसन करावे यासाठी या विस्थापित कुटूंबाची मागणी असून ना घर के ना घाट के अशी परिस्थिती झाल्याच्या प्रतिक्रीया येत आहे. या उपोषणाला आर पी आय सेक्युलर चे रवींद्र चंदणे, मनसेचे नरेश देसले माजी सभापती दिपक खाटेघरे, महेंद्र पवार तसेच मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला आहे. माञ या तात्पुरत्या पुनर्वसनामुळे विस्थापित 20 कुटुंबांचे संसार उघड्यावर पडल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहे.