मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून, नागरिक मात्र हैराण झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 61 वर किशोर गावाजवळ, रायता पुल, कांबा या ठिकाणीं पाणी भरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर तालुक्यांतील ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असल्याने सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील परीस्थिती प्रमाणेच, शहरातील विद्यानगर परीसरात सालाबाद प्रमाणे उपाययोजना न झाल्याने परिसर पूर्ण पाण्याने भरला आहे. तर शहरातील मुख्य बाजारपेठेमधील हनुमान मंदिराजवळील रस्ता पाण्याने तुडुंब भरल्याने व्यापारी वर्गाचे हाल झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीही पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने मोठ्या प्रमाणत याच व्यापारी वर्गाला नुकसान सोसावे लागले होते.
सतत पडणाऱ्या पावसाने राष्ट्रीय महामार्ग 61वर बऱ्याच ठिकाणी पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर कल्याणकडे जाण्यासाठी अनेक प्रवाशी बारवी मार्गे बदलापूर कडे जाताना दिसत आहेत. मात्र रस्त्यावरील खड्डे यामुळें मुरबाडकरांची हाडे खिळखिळी झाली असल्याचे मत प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काळू, बारवी, मुरबाडी, अश्या अनेक नद्या तुडुंब भरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.