पाणवठ्यासह जंगलात जाणारा रस्ता खुला करण्याची उचले ग्रामस्थांची मागणी
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील उचले गावाबाहेर असलेला पाणवठा व जंगलात जाणारा रस्ता आमची खाजगी जमीन असल्याचे सांगत गावातीलच गोविंद पांडुरंग भुंडेरे, तसेच त्यांची मुले वसंत भूंडेरे, अनंत भुंडेरे, संजय भुंडेरे यांनी मातीचा भराव टाकून बंद केल्याने गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर रस्ता ज्या जागेतून गेला आहे, ती जागा गावकीचा दांड रस्ता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर हा रस्ता अनेक वर्ष रहदारी साठी खुला होता. सदर बंद केल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतावर जाणारे शेतकरी, यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अनुसूचित जाती चे 5 घरे, आदिवासी समाजाची 2 घरे व आगरी समाजाची 9 घरे असून, या सर्वांना या रस्त्याने पाण्यासाठी जावे लागते. तर जंगलात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हाच रस्ता असल्याने रस्त्या अभावी या सर्वांची अडचण झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी मुरबाड पंचायत समिती, ग्रामपंचायत उचले यांच्याकडे तक्रार केली असुन, आमचा रस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायत उचले यांनी यावर करवाई करून रस्ता खुला न केल्यास आपण या प्रकारास मुक संमती दर्शवत असल्याचा आरोप करत पावसाळ्यात एखादी दुर्घटना अथवा आपत्ती जनक घटना घडल्यास यास सर्वस्वी जबाबदार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून, न्याय न मिळाल्यास पोलिस ठाण्यात जाऊन न्याय मागू असा इशारा दिला आहे.