मुरबाड तालुका शेतकरी संघाची कृषी मंत्र्यांकडे मागणी
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात मे २०२० मध्ये झालेल्या वादळी पावसाने आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात १४, १५ तसेच 16 मे दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुरबाड तालुका कृषी शेतकरी संघ (मर्या) तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या कडे केली आहे.
ज्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले त्यातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी आंबा बागेचा विमा उतरवला होता. अश्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने हेक्टरी 82 हजार रुपये नुकसान भरपाई दिली. मात्र असे अनेक आंबा बागायतदार शेतकरी आहेत की त्यांनी शासनाच्या फलोद्यान योजनेतून आंब्याची कलमे घेतली होती. मात्र त्यांच्या बागेचा विमा उतरविला नाही, असे अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. हवामान खाते व कृषी विभागाकडून अहवाल मागवून वंचित आंबा बागायतदार शेतकऱ्यांना त्वरित जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुरबाड तालुका शेतकरी संघ (मर्या) तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी करत आंबा बागायतदार शेतकऱ्यांना विमा उतरवून घेण्याचे आवाहन केले आहे.