रांजणगाव गणपती ता.शिरूर : (प्रतिनिधी,पोपट पाचंगे) – पुणे नगर महामार्गावर होत असलेल्या सततच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करत असून,त्याला लवकरच यश अपेक्षित असल्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले. रांजणगाव गणपती,ता.शिरुर येथे मानसिंगभैय्या पाचुंदकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ.कोल्हे बोलत होते.
यावेळी आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे,शिवाजीराव शेळके, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पाचुंदकर, उपसरपंच अजय गलांडे,माजी सरपंच सुषमा शेळके,दादाभाऊ शेळके, गणेश लांडे,अनिल दूंडे,निलेश लांडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश धुमाळ,हृषिकेश शेळके,पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आदि उपस्थित होते.
या महामार्गावरील वाहतूककोंडी कायमस्वरुपी लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रामुख्याने तिसऱ्या टप्प्यांत शिक्रापुरपर्यंत असलेली मेट्रो रांजणगाव गणपतीपर्यंत आणण्यात येणार असून, त्यासाठी डिपीआर तयार करण्यात येतं आहे.अष्टविनायक मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्व पाठ्यपुस्तकात यायला हवा, याकरिता शासनाकडे आग्रही मागणी मांडण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक दिवस उत्सव करणे अपेक्षित नाही,तर शिवरायांचा वैचारिक वारसा जपणारी तरुण पिढी तयार व्ह्यायला हवी.शौर्य व धैर्याची मूर्ती,भारताचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते,असेही खासदार डॉ.कोल्हे यांनी सांगितले. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार शेखर डाळिंबकर यांनी मानले.