कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई व परिसरातील आठ गावे,वाड्यावस्त्यावर भीषण जलसंकट या आशयाची बातमी आमच्या सा.समाजशील मध्ये काल दि. ११ ला प्रकाशित झाल्यानंतर आज दि.१२ रोजी तातडीने विधानभवन, पुणे येथे आंबेगाव- शिरूर, जुंन्नर तालुक्यात काही गावांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई संदर्भात विधानसभेचे माजी अध्यक्ष,आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागिय आयुक्त दिपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर यांची पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करणेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जिल्हा युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, सभापती विश्वास आबा कोहकडे, माजी सभापती सुभाषराव मोरमारे, प्रमोद प-हाड, बाबुराव साकोरे, सुधीरभाऊ पुंडे, कान्हूर मेसाई परिसरातील विविध गावचे सरपंच निवृत्ती नाणेकर,शिवराम पुंडे,बाप्पुसाहेब ननवरे,रामदास मांदळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पुणे यांनी या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना आदेश दिले.आमदार वळसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनातील विषयावार चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याबाबत सांगितले आहे.
विवेक वळसे पाटील – उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे
विधान सभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कान्हूर मेसाई व परिसरातील तीव्र पाणी टंचाई ग्रस्त गावांना तातडीने टँकर सुरु करून पाणी देण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल आज विधानभवन पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आली असून तातडीने टँकर सुरु करण्याच्या सूचना ही प्रशासना कडून देण्यात आल्या आहेत.तसेच लवकरच येत्या १८ तारखेला याच विषयावर आणखी एक बैठक आयोजीत करण्यात आली. असून शिरूरच्या पश्चिम भागातील पाणी टंचाईने ग्रासलेल्या गावांना ठोस पाणी पुरवठा करण्यासंदर्भात काय उपाय योजना करता येतील यावर विचार विनिमय होणार आहे.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)