आदिवासीं समाजाच्या प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट(मार्क्सवादी) पक्षाचा मुरबाड तहसीलदार कार्यालयावर एल्गार मोर्चा
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : आदिवासीं समाजाचे मुलभूत प्रलंबीत प्रश्न व विवीध मागण्यांसाठी आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व आदिवासीं क्रांती सेनेच्या वतीने आज मुरबाड तहसीलदार कार्यालयावर एल्गार मोर्चा आयोजीत केला होता. आदिवासींना त्यांच्या हक्काचे घर, पाणी, रोजगार, शिक्षण,आरोग्य, घरकुल, रस्ता, शौचालय, इत्यादी ज्वलंत प्रश्न आजही भेडसावत आहेत. गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांनी जगावे कसे या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. तालुक्यातील गावखेड्यांची अवस्था भयाण झाली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबे आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी आदिवासी वस्तीत जाण्यायेण्यासाठी रस्ते, पाणी, शिक्षण,आरोग्य, रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र, वारसनोंदी, पुनर्वसन, अतिक्रमण, अशा,आदिवासींच्या समस्या असुन, काही तालुक्यात बोगस डॉक्टरांचा घातलेला धुमाकूळ, रमाई, शबरी,आणि पंतप्रधान आवास योजनेचा वाटपात गरीब, गरजू, बेघर व पात्र लाभार्थ्यांना डावलून धनदांडगे, नोकरदार विविध पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना घरकुल वाटपात देण्यात आलेले प्राधान्य, रेशनिंग धान्याचा काळाबाजार, मुरबाड एम.आय.डी.सी.क्षेत्रातील कंत्राटी पद्धत बंद करणे, बंद कारखाने सुरु करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा. महात्मा गांधीराष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरु करुन गरीब गरजुना रोजगार द्यावा. म्हाडा प्रकल्पात संपादित जमिनीवर कुठलेच प्रकल्प उभारले गेले नसल्याने त्या पडित जमिनी मुळ शेतकऱ्यांना परत करण्यात याव्यात. साखरमाची पुनर्वसन प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा करणे, अशा जवळपास 57 मागण्या व प्रलंबित प्रश्न उपस्थित करून मोर्चेक-यांनी तहसीलदार संदिप आवारी, गटविकास अधिकारी व प्रत्येक खातेनिहाय प्रमुख अधिकाऱ्यांकडून आपल्या समस्यांबाबत जाणून घेत काही दिवसांचा अवधी देवुन आपल्या मोर्चाचा समारोप केला. सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरबाड येथून मोठ्या उत्स्फूर्तपणे निघाला होता. मोर्चेक-यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी काँ.पि.के.लाली, कविता वरे, दिलीप कराळे, दिनेश जाधव, सागर भावार्थे, मारुती वाघ, बाळु लचका, हिरा खोडका, बाळा दळवी, चिंतामण भांगरथ, आलका पारधी, प्रकाश टोहके , सुनील लाटे, सुनील काळण, संजय थोरात, लक्ष्मण भांडे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.