कवठे येमाई,शिरूर : खरीप हंगाम २०१९ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱयांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब पलघडमल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्ती,कीड,आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा उद्देश असून ही विमा योजना कर्जदार शेतकऱयांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असल्याचे पलघडमल यांनी सांगितले. शासनाकडून खरीप हंगामातील सर्व प्रकारच्या पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीपातील भात,ज्वारी,बाजरी,नाचणी,तूर,उडीद,मूग,भुईमूग,कांदा,कारळे,सोयाबीन इत्यादी पिकांचा समावेश असून शिरूर तालुक्यातील मूग व उडीद,बाजरी,भुईमूग या पिकांचा समावेश आहे. मूग व उडीद,बाजरी या पिकांसाठी प्रति हेक्टरी १८००० हजार व हेक्टरी ३६० रुपये हप्ता तर भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टरी ३२००० हजार विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱयांना प्रति हेक्टरी ६४० रुपये हप्ता भरावा लागणार आहे.त्याच बरोबर शिरूर तालुक्यात खरिपात तूर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३०००० हजार विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱयांना प्रति हेक्टरी ६०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहाभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलै २०१९ असून शिरूर तालुक्यांसज पुणे जिल्ह्यातील जास्तीत शेतकऱयांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन ही जिल्हा कृषी अधिकारी पलघडमल यांनी केले आहे.
तर २०१८ च्या खरीप हंगामात या योजनेत जिल्ह्यातील १८,९४७ शेतकऱयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७९६२ शेतकऱयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱयांनी नजीकच्या जिल्हा सहकारी,राष्ट्रीयकृत बँक,सहकारी सोसायटी,कृषी सहायक,पर्यवेक्षक,मंडल-तालुका कृषी अधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)