शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जिद्द,चिकाटी व मेहनत करण्याची आवड असेल तर माणसाच्या यशस्वीतेसाठी त्याचे वय ही नगण्य ठरते.त्याचेच रक उत्तम उदाहरण म्हणजे शिरूर तालुक्यातील मलठणचे वयाच्या साठीकडे झुकलेले सुरेश आप्पा गायकवाड हे होत.
उत्कृष्ट ड्रायव्हर असलेले आप्पा शेती बरोबरच स्वतःच्या ट्रकचा व्यवसाय ही करीत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघातात आप्पांचे खूपच शारीरिक नुकसान झाले. त्यातून सावरत हा योद्धा पुन्हा जोमाने कामाला लागला.मागील वर्षी मलठण बस स्थानका समोर छोट्याशा जागेत वडापाव,गुळाचा चहा,रसवंती गृह चालू केले.ग्राहकांचे हित जोपासत मात्र दहा रुपयात वडापाव,पॅटीस,गुळाचा चहा,उसाचा रस ते ही चवदार देण्याचे काम सुरु केले.एकीकडे महागाईचा भस्मासुर सुरु असताना सुरेश आप्पानी मात्र दर व क्वालिटीत सातत्य राखताना ते या भागात अल्पावधीत लोकप्रिय झाले. ग्राहक वाढले,माणसे येऊ लागली व त्यातून बऱ्यापैकी आमदनी सुरु झाली. हे सर्व हा साठी कडील योद्धा तरुणांना लाजवेल असे काम एकटा करताना दिसून येतो.
याच बरोबर धार्मिक वा सामाजिकतेची आवड सुरेश आप्पांना असून अनेक धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. महिन्यातील दर एकादशीस ते स्वखर्चाने मलठण येथील मल्लिकार्जुन मंदिरात कीर्तन सेवा आयोजित करीत असून उपस्थित भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्याचे काम करीत आहेत. “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” या काव्य पंक्ती प्रमाणे आप्पा परिसरातील वंचित,गरजू,व अडचण भासणाऱ्या नागरिकांना योग्य तो मदतीचा हात देण्याचे काम ही करीत आहेत.त्या करीता युवा क्रांती फाउंडेश अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष या नात्याने जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत आहेत.वयाच्या साठीकडे झुकलेल्या अप्पांची पहाटे साडेचार ते रात्री नऊ वाजे पर्यंत दैनिक दिनचर्या असून शारीरिक अपंगत्वार मात करीत जिद्दीने कष्ट करीत सन्मानाने जीवनाचा संघर्ष व चरितार्थ सुरु ठेवला आहे. सुरेश आप्पा गायकवाड यांचा हा जीवनपट मोबाईलच्या जमान्यात भरकटलेल्या उच्चशिक्षित तरुणांना आदर्शवत,प्रेरणादायी असाच ठरणारा आहे.