वाघाळे ते शिक्रापूर रस्त्याचे नवीन काम झाले निकृष्ठ – तात्काळ दुरुस्तीची अशोकराव सोनावणे व नागरिकांची मागणी
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील बेट भागातील नागरिकांना शिक्रापूर,पुणे कडे जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या मलठण ते शिक्रापूर या नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर वाघाळे ते शिक्रापूर दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता एक महिन्यातच उखडला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्ती कामास शासनाने लाखो रुपये खर्च केलेले असताना या रस्त्याची अल्पावधीतच झालेली वाताहात व निकृष्ठ काम पाहून संबंधितांवर कडक कारवाई करावी व रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनावणे पाटील व परिसरातील नागरिकांतून होत आहे.
वाघाळे ते शिक्रापूर (मलठणफाटा) या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी पुर्ण झाले. परंतु वाघाळे येथे (बढेवस्ती) आणि गणेगाव खालसा येथे शाळेजवळ घाटात रस्ता खुप खराब झाला आहे. त्या मुळे त्या ठिकाणी खडीवरुन गाड्या घसरत आहेत.या रस्त्याने दुचाकी,चारचाकी,शेतमाल,दूध वाहतूक शिक्रापूर,पुण्याकडे मोठ्या प्रमाणात सुरु असते. या खराब झालेल्या रस्त्यावर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. या रस्त्याच काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काही ठिकाणी काम ही अर्धवट करण्यात आले आहे. अल्पावधीत खराब झालेल्या या रस्त्यावरील अनेक ठिकाणी तर धोकादायक व अपघातास निमंत्रण ठरणारे रस्त्यावरील खडी (दगड) अशोकराव सोनावणे व त्यांच्या सहकाऱयांनी गोळा करुन बाजुला केले आहेत. या रस्त्याची कामे वारंवार व लवकर होणार नसल्याने हा रस्ता त्वरीत मजबूत,वाहतुकीस सुलभ असा दुरुस्त करुन मिळेल अशी व्यवस्था संबंधित विभागाने तात्काळ करण्याची मागणी ही अशोकराव सोनवणे व नागरिकांनी केली आहे.