टाकळी हाजी ता.शिरूर : (सतीश भाकरे,सा.समाजशील वृत्तसेवा) – कोरोनामुळे समाजव्यवस्थेत काही सामाजिक सकारात्मक बदल घडत आहेत विवाह सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिष्ठेसाठी केला जाणारा डामडौल थांबला आहे. अशाच पद्धतीने लॉकडाऊन नियमांचे पालन करीत घरगुती पध्दतीने शिरूरच्या बेटभागात विवाह पार पडत आहेत. टाकळी हाजी उचाळे वस्ती येथील गंगाराम बाळासाहेब उचाळे यांची सुकन्या चि.सौ.का.डॉ.राणी व उस्मानाबाद परांडा तालुक्यातील पांढरेवाडीचे श्री विजयकुमार खुरंगे यांचे चि.डॉ.भुषण यांचा विवाह गेल्या ३ महिन्यापुर्वी निश्चित करण्यात आला होता मात्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आल्याने साध्या पद्धतीने वधू वराच्या कुटुंबानी तयारी करून अत्यंत शांत वातावरणात विवाह पार पडला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरे करून त्यांनी इतरांना आदर्श घालून दिला आहे. शिवाय या विवाह पध्दतीमुळे वधूवर कुटुंबाच्या खर्चात बचत होताना दिसत आहे. तसेच होणाऱ्या अनाठायी खर्चाला मोठाच आळा बसताना दिसत आहे.
संभाजीराव साबळे सर – अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना
“सध्या ग्रामीण भागात साध्या पद्धतीने विवाह सोहळे पार पडत आहे. विवाहात होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत विवाह सोहळे आनंदी वातावरणात शासनाच्या नियमानुसार पार पडत आहे. मानापमानामुळे घडणा-या घटनांनाही यानिमित्ताने पायबंद बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अशा विवाह सोहळ्याची प्रथा जोर धरू लागली आहे. यामुळे वधूवर कुटुंबाच्या चेह-यावर आनंद दिसत आहे. अशा सकारात्मक बदलांमुळे सामाजिक आर्थिक विषमता दूर होवून समाजव्यवस्था पुढारली जावू शकते”.