दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : कंढरे येथे तब्बल बारा वर्षानंतर कानबाई मातेचा उत्सव भक्तांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. त्यामुळे गावात एकंदरीत चैतन्याचे वातावरण होते. त्यात सर्व भाविकांनी कानबाई मातेकडे लोकांचे सुदृढ आरोग्य व जोरदार वरूण राजाची मागणी केली. यावेळी कानबाई मातेच्या भक्तांसाठी गावात नागरिकांनी टँकरद्वारे तसेच विविध माध्यमातून कुत्रीम पाणी फवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. दि. १५ ऑगस्ट रविवार रोजी घरीच कानबाई मातेचे स्थापना केली. एक दिवशीय कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात जोरात साजरा केला.
आज दि. १६ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळपासुन कानबाई मातेच्या विसर्जनाची लगबग भाविकांची सुरू होती. जवळपास सर्वच कानबाई मातेला गावभरात मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने गावातील नागरिक व्यवसाय, नोकरी निमित्ताने बाहेर गावी राहत असलेल्या नागरिकांनी कोणत्या आजाराला व भीतीला न घाबरता बिनधास्त पणे कानबाई मातेच्या गाण्यावर ठेका धरलेला दिसून येत होते. गावात प्रसन्नमय वातावरण निर्माण झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोविड ह्या आजाराने भेट होऊ देत नसल्याने कानबाई उत्सवाच्या निमित्ताने लांबलांबून नागरिक गावात दाखल झाले होते आणि मनसोक्त गप्पा मारत वेगळा आनंद घेत होते. या भक्तिमय वातावरणात कानबाई मातेला वाजत गाजत गुलालाची उधळण करत निरोप देण्यात आला. “हो शेवटी बळीराजाचे राज्य येऊ दे” असे साकडे गावकऱ्यांच्या वतीने टाकण्यात आले.