शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या व व्यापारी बाजारपेठ असलेल्या कवठे येमाई गावातील ऐतिहासिक महादेव मंदिर परिसरात आज दि. ०९ ला सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान जेसीबी मशिनच्या साहायाने स्वच्छता करण्यात आली. याबाबत सा.समाजशील मध्ये “कवठे गावाला अखेर नवीन मोठी कचरा गाडी – गावातील कचऱ्याचे होणार जलद व्यवस्थापन” या आशयाच्या दि. २७ मे ला प्रसिद्ध झालेल्या बातमीचा चांगलाच सकारात्मक परिणाम आज दिसून आला.साठलेल्या कचऱ्याबाबत ग्रामपंचायतीने तात्काळ कार्यवाही करीत कचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन करीत महादेव मंदिर परिसर स्वच्छ केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी,महादेव भक्तांनी ग्रामपंचायतीस व सा.समाजशील ला धन्यवाद दिले आहेत.
कवठे येमाई गावात अनेक ऐतिहासिक मंदिरे,राजवाडा असून गावठाणातील मुख्य बाजारपेठे लगत असणारे भव्य महादेव मंदिर,दगडी बांधकामातील सुसज्ज बारव खरे तर पूर्वजांचा वारसा,ठेवा म्हणून ग्रामस्थ जपण्याचे काम करीत आहेत.मंदिरासमोरील मोकळ्या जागेत काही ग्रामस्थ हकनाक कचरा,राडारोडा टाकून परिसर विद्रुप करण्याचे काम करीत आहेत.पावसाळा सुरु होण्या अगोदरच या परिसरात साठलेला कचरा एक मोठा खड्डा घेऊन त्यात गाडण्यात आला.परिसरातील झाडेझुडपे ही काढण्यात आली.व परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा यांनी या प्रश्नी केलेला पाठपुरावा व ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे,बबन नाना शिंदे यांनी आज स्वतः लक्ष घालून,उभे राहून हा परीसर चकाचक करून घेतला.आता गरज आहे ती परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडे साठणारा ओला,सुका कचरा वेगळा करून नियमितपणे नव्याने ग्रामपंचायतीकडे नव्यानेच आलेल्या सुसज्ज घंटागाडीतच नियमितपणे टाकण्याची व आपले गाव,परीसर स्वच्छ कसा राहील याची दक्षता घेण्याची. तेथे कचरा न टाकण्याबाबत सूचना फलक लावण्यात यावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.