शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील ४६ वर्षांपासून अहिंसा परमो धर्म या संकल्पनेस अनुसरून जैन धर्माचा प्रचार,प्रसार व जनजागृतीचे काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील जैन साध्वी प.पु. तपस्वी हेमप्रज्ञा महाराज यांनी सर्वसामान्य लोकांनी आजही साधी रहाणी,उच्च विचार संकल्पना राबविण्याची आत्यंतिक गरज असल्याचे मात व्यक्त केले आहे. कवठे येमाईत जैन आराधना भवन येथे आयोजित व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या.
प.पु. आनंद सागर सुरीश्वरजी महाराज यांच्या समुदायातील या ५ जैन साध्वी संपूर्ण भारतभर पायी भ्रमण करून जनजागृतीचे काम त्या अव्याहतपणे करीत आहेत. जैन साध्वी प.पु. तपस्वी हेमप्रज्ञा महाराज यांच्या सोबत मध्य प्रदेशातील प.पु.साध्वी अनंत निधी महाराज,प.पू.साध्वी निराग यशा माहाराज,प.पु.साध्वी नवकार निधी महाराज,प.पु.साध्वी पुण्यनिधी महाराज या ही समाज जनजागृतीचे कार्य तळमळीने करीत आहेत.
अहिंसा परमो धर्म,जीवदया ही संकल्पना प्रत्येकाने अवलंबित करतानाच जे आपल्याल्या आवडत नाही ते दुसर्यावर लादण्याचा ही प्रयत्न करू नये. या संकल्पनेचे सर्व धर्मातील लोकांनी मनापासून पालन केले तर संपूर्ण संसार जगात सुखी,समाधानी होईल असे विचार प.पु.साध्वी अनंत निधी महाराज यांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे या साध्वी एम.ए.इंग्लिश अशा उच्च शिक्षित आहेत.त्या पुढे म्हणाल्या की,सध्याच्या काळात पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी होत नाही. देशात आज हजारो कुटुंबे केवळ पैशांअभावी गरिबीत दिवस काढत आहेत.तर पैशांमुळे अनेकांचे जीवनमान विलासी झाले आहेत. गरीब आणखीच गरीब होत चालले आहेत.या करीता साधी राहणी व उच्च विचार ही संकल्पना प्रत्येकाने अवलंबली तर भारतातील जनतेचे नक्कीच खूप चांगले कल्याण,भले होईल असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला आहे. जैन श्वेतांबर मूर्तिपूजक असलेल्या कवठे येमाईतील जैन बांधवांना जीवनात करावयाच्या विविध सकारात्मक गोष्टींबद्दल आज जैन साध्वी प.पु.साध्वी अनंत निधी महाराज यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी कवठे येमाई जैन संघाचे धरमचंद बाफणा, रितेश शहा, माजी ग्रामपंचायत सदस्य मिठूलाल बाफणा,ललितकुमार कोचर,पुनमचंद कोठारी,राकेश बोरा,विजयकुमार गांधी अनेक जैन बंधू व भागणी उपस्थित होते.