मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्याने कोरोना महामारीतुन सुस्कारा सोडला असला तरी, साथीचे रोग पाठ सोडत नसल्याने तालुक्यातील वाड्या पाड्यावर थंडी, ताप, सर्दी सारखे आजार सुरू झाले आहेत. शासकिय रूग्णालयात या रूग्णांच्या रक्ताची तपासणी दरम्यान काही गावातील 9 रूग्णात डेंग्यु व लेप्टो झाल्याचे निदर्शनास येताच तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीधर बनसोडे यांनी आरोग्य विभागातील कर्मचा-यांना गावोगावी रूग्ण शोध व उपचार मोहिम सुरू केली आहे.
मुसळधार पाऊस पडला तर मच्छर मरून जातात किंवा घराच्या परिसरात डबके साचतात. मात्र या वर्षी गेल्या महिनाभरापासून तुरळक पाऊस पडत असल्याने या अल्प पाऊसामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. यात थंडी, ताप, मलेरिया, सर्दी यांसह डेंग्यू व लेप्टोचे रूग्ण सापडले आहेत. मुरबाड शेजारील वाघिवली गावात चार तर माळशेज घाटालगतच्या केळेवाडी वाल्हीवरे येथे पाच रूग्ण सापडल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रीधर बनसोडे यांनी दिली. तसेच कमी पाऊस पडत असल्याने हे जंतू पसरले असले तरी तात्काळ उपाय योजना म्हणून आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक ग्रामिण भागातील आरोग्य कर्मचारी घरोघरी तपासणी करून तात्काळ रक्त नमुने तापासुन घरीच उपचार देण्याची योजना सुरू केल्याने ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे.
तालुक्यातील साथीच्या आजाराला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा जरी सज्ज असली तरी ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच सदस्या ऐवजी ग्रामसेवकच पहात असल्याचे दिसत आहे. सालाबाद प्रमाणे पावसाळा सुरू झाल्याने गावोगावी साथीचे आजार डोकं वर काढणार ठरलेले असताना गावात धुरफवारणी गावातील गटारं साफ करणे अशी मोहिम राबवली जात नसल्याने केवळ ग्रा़.पं. चा दुर्लक्षीतपणा व आरोग्य सेवक यांची जनजागृती मोहीमेतील अकार्यक्षमता यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मुरबाड तालुक्यातील नागरिक करत आहे. वाघीवली येथे एकाच कुटुंबातील पाच ते सहा जणांना डेंग्यू झालेला असून यातील एक महिला रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. परंतु आरोग्य विभागाने हा रुग्ण दुस-या आजाराने दगावला असल्याचे सांगीतले. वघिवली गावात आरोग्य कर्मचारी वर्गाने तपासणी सुरु केली असता. एका घरातील फ्रीजच्या मागच्या बाजुला असलेल्या भांड्यामध्ये डेंग्यू चे जंतु मिळून आले होते. याच घरातील काही रुग्णावर ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे उपचार सुरु असून दगावलेली दर्शना दत्तात्रेय विशे हि कल्याण येथे उपचार घेत असल्याचे सांगितले होते . मात्र ही महिला डेंग्यू ने दगावली नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मग हा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला? असा सवाल नागरिक करत आहे.