टाकळी हाजी,शिरूर (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुंडलिक थोरात यांच्या शेळीवर बिबट्याने गुरुवारी सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाली.दिवसाच पाळत ठेवून शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
विष्णु थोरात हे घरापासून जवळच शेळ्या चारत होते. अचानक उसाच्या शेतातून बिबट्याने शेळी वर झडप घेत शेळीला घेवून ऊसात पोबारा केला. थोरात यांनी आरडाओरडा करताच शेजारी तिकडे धावत आले परंतु त्यांना ऊसात शोध घेईपर्यंत बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले आले.
काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात बिबट्याच्या बछड्याचा उपासमारीने मृत्यू तसेच शिकार न मिळाल्यामुळे थेट मानव वस्तीतच प्रवेश करून पशुधनावर बिबट्याचे हल्ले अशा अनेक घटना घडूनही वनविभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात यांनी केला आहे.
बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून महावितरण ने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज द्यावी,वनविभागाने तात्काळ पिंजरे लावावे, तसेच पशुधनावर हल्ले झाल्यानंतर तात्काळ पंचनामे व्हावेत अशी मागणी टाकळी हाजींच्या कर्तव्यदक्ष सरपंच अरुणाताई घोडे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई थोरात यांनी केली आहे.