मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड रेल्वे 2025 पर्यंत धावणार असा विश्वास दाखविला जात असताना सध्या कामाच्या गतीला ब्रेक लागल्याने मुरबाड रेल्वे पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. एप्रिल 2023 पासुन मुरबाड कल्याण रेल्वे मार्गासाठी जाणाऱ्या जागेचा सर्व्हे व भूमापन प्रक्रिया सुरू झाली होती. योग्य मोबदला मिळावा यासाठी रेल्वे संघर्ष समिती स्थापन करण्यात आली, जमिनीला योग्य मोबदला व नोकरी याबाबत मागण्या करण्यात आल्या. काही ठिकाणी रेल्वेसाठी जमिनीत पोल गाडले गेले. यामुळे रेल्वेच्या ज्या जमिनीत पोल गाडले गेले त्यांना त्वरित मोबदला मिळेल असा विश्वास व्यक्त होत होता. शेतकऱ्यांचा जमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी प्रांत अधिकारी भांडे पाटील यांच्या दालनात बैठक ही संपन्न झाली होती. माञ या बैठकी नंतर जमिन अधिग्रहण कामाला ब्रेक लागल्याने पुन्हा हा विषय चर्चेचा बनला आहे.
खासदार कपिल पाटील यांनी या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या सर्व मान्यता मिळाल्या असल्याचे वारंवार सांगितले. मात्र सध्या भाजपाच्या स्थानिक राजकारणात आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांच्यात विकासाच्या नावाने व नव्या प्रकल्पाच्या नावाने शाब्दिक चकमक सुरू असल्याने आमदार किसन कथोरे समर्थक तसेच भाजपचेच कार्यकर्ते मुरबाडकराना रेल्वेचे गाजर दाखवले असल्याचे बोलत आहेत तर आमदार किसन कथोरे यांनी माळशेज घाटातील काचेचा पुल यामुळे मुरबाड तालुक्यातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार या केंद्राच्या प्रकल्पाला कुठलीच मान्यता न मिळाल्याचे जाहिर सभेत बोललेमुळे केंद्र सरकारच्या अधिपत्यात येत असलेले काचेचा पुल व मुरबाड रेल्वे हे अजूनही कागदावरच असल्याने मुरबाड रेल्वे आणि काचेचा पुल होणारं का? की पुन्हा आगामी निवडणुकीत रेल्वेचा विषय घेऊन निवडणूक रंगणार अशी चर्चा सुरू आहे.