मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – तालुक्यातील ग्रामीण भागात वीज चोरी करणाऱ्या तब्बल १६१ लोकांवर धाडी टाकून वीजचोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य महावितरणकडून जप्त करण्यात आले. या वीज चोरीची रक्कम काही लाखांच्या घरात जाईल अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली. या विज चोरीच्या प्रकरणाची वीज बिले तयार करण्याचे काम सुरू असून दंडासह बिल वसुली केली जाणार आहे. बिल न भरल्यास या लोकांवर पोलीस केस करण्यात येणार आहे. महावितरण कार्यालयात कर्मचारी कमी आहेत याचा फायदा घेऊन मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली जात असून यावेळी महावितरण कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांची पथके तयार करून धाडी टाकण्यात आल्या. यात सर्वात जास्त गुन्हे शिरोशी विभागात उघडकीस आले आहेत.
मुरबाड तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण खूप असून कारवाईच्या भीतीने हे प्रमाण कमी झाल्याचे ही दिसते. मात्र छोट्या वर कारवाई व मोठ्यानं कडे दुर्लक्ष अशी परिस्थिती झाल्याचे दिसत आहे. मुरबाड शहरात चारशेच्या वर अनधिकृत गाळे रस्त्यालगत बांधण्यात आले आहेत.यापैकी अनेकांना अनधिकृत वीज पुरवठा देण्यात आला असल्याची माहिती मिळत असून अशा अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा देता येतो का ? जर देता येत नसेल तर मुरबाड शहरातील चारशेच्या वर अनधिकृत गाळयात वीज पुरवठा होतो कसा ? या कडे कानाडोळा का केला जातो ? अशी विचारणा नागरिक करत आहेत. वीज चोरांवर कारवाई झालीच पाहिजे पण त्यात कारवाई ही पारदर्शक असावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वीज चोरांवर करण्यात आलेल्या कारवाई मुळे वीज मंडळाला फायदा होणार आहे हे जरी सत्य असले तरी अनेक गावातील खांब,ट्रान्सफारर्मर,डीपी,लटकत्या वायरी याचीही दुरुस्ती महावितरणने त्वरित करावी अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.