कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,सा.समाजशील) – शिरूर तालुक्यातील चासकमान कॅनलवरील अपघातग्रस्त भाग त्वरित दुरुस्त करून कॅनललगत लोकवस्ती असलेल्या भागातीळ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाय योजना तातडीने करण्यात याव्यात याबाबत शिरूर तालुका शेतकरी सेनेने आज पाटबंधारे विभागाकडे मागणी केली. याबाबतचे लेखी निवेदन शिरुर तालुका पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दि.ना.साठे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी शेतकरीसेनेचे शिरूर तालुका प्रमुख योगेश ओव्हाळ, शेतकरीसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत थोरात,जेष्ठ शेतकरी नेते बबनराव पर्हाड,शेतकरी नरसिंग पलांडे गुरुजी,मोहन देशमुख,शिवसैनिक,मोहन शेलार,सौरभ वाव्हळ,आशिष गायकवाड इत्यादी उपस्थित होते.मागील काही दिवसांपूर्वी वाघाळे परिसरातून जाणाऱ्या चासकमानच्या कालव्यात पुलाला सुरक्षा कवच नसल्याने चारचाकी कोसळून अण्णापूर येथील २ तरुणांचा मृत्यू झाला होता. परिसरात शेतीमुळे अनेक कुटुंबे वास्तव्यास असून शाळकरी विद्यार्थी,शेतकरी व नागरिकांना अनेकदा कालवा परिसरातून येजा करावी लागते. तर कालव्यातील पाण्यात पशुधन पडून ते दगावल्याच्या घटना ही घडलेल्या आहेत. असे असताना अपघात झालेल्या चासकमान कालव्याच्या पुलावर योग्य ती सुरक्षा यंत्रणा तातडीने बसविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून त्यावर पुढील २ महिन्यात योग्य ती कार्यवाही न झाल्यास या प्रश्नी तालुका शेतकरी सेना आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आल्याचे तालुका प्रमुख योगेश ओव्हाळ यांनी सांगितले.