वाडा, (-प्रतिनिधी, संजय लांडगे) : तालुक्यातील श्रीक्षेत्र तिळसे येथे मुंबईकर प्रतिष्ठान शिवडी व जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणा यांच्या वतीने शनिवारी आदिवासी कुटुंबातील १४ वधू-वरांचे सामुदायिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उपस्थितीत संपन्न झाला. वाडा तालुका हा संपूर्ण आदिवासी बहुल तालुका असुन या तालुक्यातील जनतेच्या वाट्याला अठरा विश्व दारिद्र्य हे पाचवीलाच पुजलेले आहे. आपल्या उदरनिर्वाहसाठी स्थलांतरीत होणा-या या माझ्या समाजाकडे विवाह सारख्या सोहळ्यासाठी पैसे कसे असणार त्यामुळे असे सामुदायिक विवाह सोहळे ही आज काळाची गरज आहे. असे मत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी या प्रसंगी बोलतांना व्यक्त केले. या कार्यक्रमात जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कवी संजय गुरव, आदर्श पत्रकारीता अनंता दुबेले, सामाजिक योगदान संतोष पवार, दत्ताराम जाधव, शरद मोरे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर उमेश खिराडे व उर्मिला खिराडे यांचा उत्कृष्ट समाजपयोगी प्रोजेक्ट अॅवार्ड देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, नगरसेविका रुचिता पाटील, अशोक गव्हाळे, अध्यक्ष राजेश रिकामे, मुंबईकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पवार, रोशनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.