जुन्नर, पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर याठिकाणी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने त्यांचे पंचनामे करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना बजावून सांगितले होते. आज दि. १९ ला शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज जुन्नर तालुक्यातील येडगाव येथे जाऊन निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या फळ बागांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच राहुल जालिंदर काशीद यांच्या पोल्ट्री फार्मचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची देखील पाहणी केली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील काही भागात शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून काही शेतकऱ्यांचे बाकी आहेत ते तातडीने करण्यासाठीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.