मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील “हागणदारी मुक्त गाव” असलेल्या तळवली (बारागाव) येथे अनेक लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनेतुन शौचालय बांधून पूर्ण केले. पण आज तीन वर्षे उलटले तरी योजनेचा लाभ न मिळाल्याने पंचायत समितीच्या फेऱ्या मारून आर्थिक, शारीरिक नुकसान सहन करत आहे. ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी करून निधी न मिळाल्याने गटविकास अधिकारी मुरबाड यांना पत्र देऊन शासनाचा निधी त्वरित मिळावा अशी मागणी मुरबाड तालुका कृषी संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार केली आहे.
याबाबत प्रकाश पवार यांनी पंचायत समिती मुरबाड, जिल्हापरिषद ठाणे याना निवेदन दिले आहे. यात मंगल वेखंडे, माणिक वेखंडे, रघुनाथ बांगर, संदीप गोल्हे, तानाजी बोराडे सुनील बोकडे, शांताराम वेखंडे हे लाभार्थी वंचित असल्याचे म्हटले आहे. याबाबत सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भालचंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या लाभार्थ्यांसह अजून 14 लाभार्थी वंचित असल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामसेवक वर्गाने याचा पाठपुरावा केला. मात्र त्यावेळो रोजगार हमी मधून सदर लाभार्थ्यांचे मस्टर न बनल्याने त्यांना लाभ न मिळाल्याचे सांगितले. सध्या मी त्याचा पाठपुरावा करत असून लवकरच याचा निर्णय होईल व लाभार्थ्यांना लाभ मिळेल असे सांगितले.