नवीन कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना साठा करण्याची मिळणार मुभा
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : देशभरात नवीन कामगार व शेतकरी विधेयकाला विरोध होत असताना नवीन कृषी विधेयकाच्या अनुषंगाने कृषी व्यवसायावर अधिक चर्चा करतांना खासदार पाटील यांनी कांदा व्यावसायिकांची उदाहरणे देऊन नफ्याचा दावा केला. तसेच ह्या विधेयकानुसार शेत मालाचा साठा करण्याची मुभा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. तर कामगार विधेयक मंजूर होताच मुरबाड मधील सर्वात मोठा टेक्नोक्रप्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीने पावर निर्मिती करणारा पावर डिव्हिजन बंद केल्याने त्यातील 58 कामगार बेकार झाले. त्यातील धानिवली गावातील 35 तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे कामगार व शेतकरी विधेयकाला विरोध होत असताना मुरबाड मधील कामगारांना न्याय मिळवुन देऊ असा दिलासा देत संसदेच्या निर्णयाची अंमलबजावणी अजून झाली नसून, मुरबाड मधील कामगारांसंबंधी आपण कंपनी व्यवस्थानाशी बोलू असे आश्वासन दिले. खासदार कपिल पाटील आज भाजापाच्या मुरबाड तालुका व शहर कार्यकारिणीच्या निवडीसाठी मुरबाड मधील एम. आय. डी. सी. हॉल येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असे सूचित करत गाफील न रहात अधिक जोमाने कामाला लागण्याच्या सूचना ही केल्या. केंद्र सरकारच्या कामा बाबत बोलताना राफेल, तीन तलाक कायदा, काश्मीर मधील ३७० कलम, आयुष्यमान भारत योजना, जनधन या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी देशाचा सन्मान वाढवला असल्याचे सांगितले. मात्र बैठकी नंतर झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान हाथरसच्या अत्याचाराचा मुद्दा घेत राहूल गांधींवर टीका ही केली. तसेच सुप्रिया सुळे यांचा ही उल्लेख करीत काही जुन्या घटनांना उजाळा दिला. मात्र झालेल्या कृत्याची कुठेही खंत व्यक्त न करता या घटनेचे राजकारण होत असल्याचे बोलले तर नुकतेच अंशकालीन काळात मुरबाड रेल्वे संबंधी प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधले होते व मुरबाड कराना दिलासा दिला होता. मात्र आज मुरबाड मध्ये याबाबत त्यांनी बोलणे टाळले. यावेळी बैठकीला आमदार किसन कथोरे, तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, सुभाषआप्पा घरत, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.