पातूर,अकोला : (प्रतिनिधी,श्रीधर लाड) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पातूर शहरांमध्ये भीमसैनिक आणि पातूर पोलिसांनी महामार्गावरील खड्डे बुजवून अभिनव पद्धतीने भीम जयंती साजरी करून समाजाला प्रेरणादायी संदेश दिला.
अकोला जिल्ह्यातील तालुका पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी, पीएसआय अमोल गोरे, पीएसआय मीरा सोनवणे तथा पोलीस कर्मचारी वृंद आणि समता युवक मंडळाच्या भीमसैनिकांनी पातुर – बाळापुर रोडवरील जल्लू हॉटेल, सुपर हॉटेल, मिलिंद नगर चौक, संभाजी महाराज चौक, भीम नगर पुलाजवळ महामार्गाला पडलेले असंख्य खड्डे मुरूमाने भरले.
गेल्या अनेक महिन्यांपासून पातुर बाळापुर महामार्गावर असंख्य खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे मालवाहू वाहनासह सर्व प्रकारच्या वाहनांना आणि पातुर शहरवासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
त्यामुळे पातुर पोलीस आणि भीमसैनिक यांनी संयुक्त पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवित अभिनव पद्धतीने भिमजयंती साजरी करून समाजाला प्रेरणादायी संदेश दिला.
यामध्ये प्रामुख्याने निर्भय पोहरे,बळीराम खंडारे ,मंगल डोंगरे ,जितेश शिरसाट, सागर कढोणे, सचिन सुरवाडे, फिरोज खान, बाळू बगाडे, सुधाकर शिंदे, स्वप्निल सुरवाडे, सय्यद इम्रान, मंगेश गवई, निखिल उपरवट, शुभम गवई, बबलू तेलगोटे, संतोष वाघमारे, अक्षय सावळे, धीरज इंगळे, अमित खंडारे, विपुल पोहरे, विकास सरदार, धीरज खंडारे, सतीश सुरवाडे आदींसह भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीस जनतेला खड्ड्यांचा रस्ता मुरूम भरून खड्डेमुक्त करून सर्वांसाठी सुकर करून दिला. त्यामुळे पातुर शहरवासीयांनी पोलिस आणि भीमसैनिकांचे मनोमन धन्यवाद मानले आहेत.