पुणे (देवकीनंदनं शेटे, संपादक): जगभरात कोरोनाने आहाकार माजवला असुन, भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र व त्यात पुणे व मुंबई शहरात कोरोना विषाणु अधिक फैलावला आहे. त्या अनुषंगाने या जिल्हयात व शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असाच सुरु राहिला तर अनेक रुग्णांचा हकनाक बळी जाईल, अशी भीती अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बेडचा तुटवडा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तसेच रेमडेसॅव्हीअर इंजेक्शन कमतरता दिसून येत असून, या गोष्टींची व्यवस्था तत्काळ व्यवस्था न झाल्यास पीपीई किट घालून अजितदादांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा रुग्ण हक्क परिषदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला असल्याचे रुग्ण हक्क परिषदच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सविता बोरुडे यांनी समाजशील शी बोलताना सांगितले.
तर निवेदनामध्ये गेली वर्षभर करोनाच्या नावाखाली रुग्णांच्या हक्काचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाला नाही. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निधी सुद्धा पूर्ण कोणाला मिळाला नाही. आमचा भांडायचा – आंदोलन करण्याचा अधिकार पोलिसांनी, पर्यायाने सरकारने हिरावून घेतला आहे. हॉस्पिटल वाल्यांच्या लुटीला आणि मनमानी पध्दतीने कसायासारखे कापणाऱ्या, रुग्णांच्या खिशावर-घरावर लाखो रुपयांचा दरोडा घालणाऱ्या मग्रूर व्यवस्थेला, कायद्याने सरळ करणाऱ्या रुग्णसेवकांना, पोलीस आणि हॉस्पिटलने पाळलेले बाऊन्सर धमकावत आहेत. इथे सामान्य माणसाला न्याय मिळणार कसा? आणि केव्हा मिळणार? असा सवालही उमेश चव्हाण यांनी केला आहे. यावेळी गिरीष घाग, दीपक पवार, विकास साठे, सिकंदर मन्सूरी उपस्थित होते.