जगदेव रामजी उराव यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त (१५ जुलै २०२१) वनवासी कल्याण आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला. आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत असताना गेल्या वर्षी १५ जुलैला छत्तीसगडमधील जशपूर येथे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची आश्रमाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांच्या कार्याचा व्याप वाढला. वनवासींच्या हितरक्षणासाठी त्यांना प्रसंगी संघर्षही करावा लागला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी कुंभ, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, उज्जैन कुंभ असे मोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. जनजातीतील उत्सवांना व्यापक स्वरूप देऊन त्यांनी सर्व जनजातींना एकत्र आणले.”
“निर्मळ मन, अमोघ वक्तृत्व यामुळे ते जिथे जातील तिथल्या कार्यकर्त्यांना ते आपलेसे करीत. या सर्व प्रवासात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांच्या कामाबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. पण त्यांना कधी अहंकार शिवला नाही. त्यांच्या मनात सतत जनजातींच्या उत्थानाचेच विचार असत. फक्त आपल्याच नाही तर सर्व जनजातींच्या विकासाचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांना मराठी भाषा समजत असे. त्यांनी जशपूरमध्ये गणेशोत्सव सुरू केला. त्यासाठी पुण्याहून अथर्वशीर्षाची २५० पुस्तके मागविली होती,” अशा अनेक आठवणी कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितल्या.