विद्युत वितरण कंपनी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

250

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे तसेच शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी या मागणीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ रोजी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत माहिती देताना राजेंद्र गावडे म्हणाले की चार महिने मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत वितरण कंपनीने विज बिल वसुली मोहीम हाती घेतली असून, हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करीत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे तसेच शिरूर तालुक्यामध्ये गावागावात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला रात्रीच्या वेळेस विद्युत पंप सुरू करून शेतीला पाणी देणे शक्य होत नाही, तरी शेतीसाठी दिवसा १२ तास सेवा द्यावी. बंद केलेले विद्युत रोहित्र पुन्हा सुरू करण्यात यावेत अशी मागणी राजेंद्र गावडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या या मागणीला विद्युत वितरण कंपनीने हिरवा कंदील दिला आहे. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे तसेच तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *