मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील नारिवली, कोरावळे, मोहप जंगलाच्या परिसरातील गावा शेजारी व जंगलात बिबट्याचा वावर होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या संदर्भात वन विभागाला माहितीही होती असे असताना. दिं.08/02/2023 रोजी कोरावळे गावच्या जंगलात बिबट्याचा मृत्यूदेह आढळल्याने बिबट्याचा मृत्यु नेमका कश्याने झाला याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हा मृत्यू अकस्मात असल्याचा प्राथमिक अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे. शविच्छेदना अहवाल प्राप्त न झाल्याने मृत्यू चे कारण अजूनही अस्पष्ट आहे. मुरबाड तालुक्यातील काही दिवसा पूर्वी कोरावळे येथे बिबट्या चा वावर असल्याचे कोरावळे गावचे सरपंच योगेश ठाकरे यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले होते. मागील 5 ते 6 दिवसा पासून तालुक्यांतील नारिवली गावा शेजारी बिबट्याचा वावर होत असल्याचे नारिवली गावचे उपसरपंच दयानंद भोईर यांनी नारिवली विभागाचे देहरी वनपाल दिनेश फर्डे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत चोकशीअंती संबंधित पाऊल खुणा या बिबाट्याचे असल्याचे समोर आले होते.
तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करत जंगले नष्ट होत आहेत. तर यामुळे वन्य जीव प्राणी , पक्षी यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे या बिबट्याचा मृत्यु असे बोलले जात आहे. हा मृतदेह कोरावळे गावच्या जंगलातील लघु पाटबंधारे विभागाच्या धरणाच्या शेजारील जंगलात आढळून आला आहे. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील, वनरक्षक अल्पना भोईर, वनपाल संदीप केदार यांनी तात्काळ घटना स्थळी जंगलात धाव घेतली. या प्रसंगी 2 वर्ष वयाचा बिबट्या जंगलातील पायवाटेवरच मृत्युमुखी पडला असल्याचे समोर आले. बिबट्याच्या मृत्यु साधरण 4 ते 5 दिवसां पूर्वी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याचे मृत शरीर फुगलेल्या अवस्थेत होते. तर त्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही सुटली होती.
वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी व वन्य प्राणी
जीवरक्षक अविनाश हरड हे ही घटनास्थळी उपस्थित होते. मृत बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा यांनी बिबट्याचे पोस्टमार्टम केले असून, बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र अहवाल प्राप्त न झाल्याने मृत्यूचे मूळ कारण अजूनही अस्पष्ट आहे. मुरबाड व शहापूर तालुक्यात मागील तीन वर्षात शेकडो वनतलाव वन्य जीव प्राण्यांच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी तयार करण्यात आले. मात्र असे असताना वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावा शेजारी येत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यामूळे हे शेकडो वन तलावातील पाणी साठा व सध्याची स्थितीची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, अवैध जंगल तोड, व वणवा यावर नियंत्रण आणण्यात वन खात्याला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे.