कवठे येमाई,शिरूर : ग्रामीण भागातील शेतकऱयांनी वैयक्तिक व कुटुंबाचा विमा उतरवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया रांजणगाव गणपती शाखेच्या शेतकी अधिकारी दीपा सोनवणे यांनी केले. त्या आज बँकेच्या वतीने कवठे येमाई ग्रामपंचायत कार्यालयात परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित आर्थिक साक्षरता व कृषी कर्ज मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुणे महाव्यवस्थापक कल्पेकर हे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सोनवणे पुढे म्हणाल्या कि, शेतकऱ्यांसाठी बँकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत.शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत ३ लाखांपर्यंतच्या कर्जास ३ टक्के सौलत देण्यात येत असून शेतकऱयांनी कर्ज परफेड वेळेत केल्यास किंवा जुने कर्ज भरून नवीन कर्ज घेतल्यास व्याजाचा भुर्दंड बसत नाही. ए बी एल स्कीमची माहिती देताना सोनवणे म्हणाल्या कि,शेतकऱ्यांना बँकेच्या वतीने या योजने अंतर्गत ३ लाख ते २ कोटी रुपयांचे कर्ज सुविधा उपलब्ध असून ते ७२ महिन्यांसाठी ते असते. खासकरून ज्या शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त जोडव्यवसायातून उत्पन्न मिळते अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना बँकेच्या वतीने राबविण्यात येत असल्याच्या त्या म्हणाल्या. या व्यतिरिक्त शेतकरी विम्या संदर्भात ही सविस्तर माहिती दिली.
तर सुमारे १५ हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरु करावी अशी माजी सरपंच सुदाम इचके,सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर व ग्रामस्थांच्या मागणीस उत्तर देताना बँकेच्या रांजणगाव शाखा व्यवस्थापक राखी एक्का यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांची ही मागणीचा वरिष्ठांकडे लवकरच पाठपुरावा करण्याचे व या भागातील शेतकऱयांना बँकेशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या सेवा व सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. अधिक माहिती साठी शेतकऱयांनी स्टेट बँकेच्या एम आय डी सी रांजणगाव गणपती शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन एक्का यांनी केले.या वेळी कारेगाव बँक प्रतिनिधी विजय शेलार सह अनेक मान्यवर ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)