कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे) : शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक पर्यंत अखेर ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मीना कालव्यातून पाणी उपलब्ध झाले असून याप्रश्नी तातडीने पाठपुरावा केल्याने आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मीना कालव्याचे पाणी म्हसे बु पर्यंत पोहचले. म्हसे बु.सोसायटीचे चेअरमन सोनभाऊ मुसळे,शिवाजी चाटे,प्रकाश वायसे व ग्रामस्थांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानले आहेत.
४० वर्षांपूर्वी मीना कालव्याचे काम या परिसरातुन करण्यात आले आहे. होणेवाडीपर्यंत या कालव्याचे पाणी येत होते परंतु त्यापुढे शिनगरवाडी, डोंगरगण व म्हसे बु पर्यंत पाणी जात नव्हते .त्यापुढील भागात काटेरी झुडपे व मातीने कालवा गाडल्याने पुढील भागापर्यंत पाणी पोहचत नव्हते. हा महत्वाचा प्रश्न सोनभाऊ मुसळे,चाटे,वायसे व या भागातील शेतकऱ्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याकडे मांडत कालवा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती.या कालव्याचे पाणी म्हसे बुद्रुक पर्यंत पोहोचल्यास शेतीसह जनावरे व पिण्यासाठी पाणी मिळून शेतकऱयांना दिलासा मिळेल त्यामुळे वळसे पाटील यांनी या कामाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती शेतकऱयांनी केल्याने आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने भीमाशंकर कारखान्यामार्फत दोन जेसीबी उपलब्ध करून दिल्याने या कालव्याचे खोलीकरण करण्यात आले.पाटबंधारे विभागाने देखील याकामी सहकार्य करून या कालव्यातून पाणी टेल पर्यंत पोहचवण्यासाठीप्रयत्न केले.अखेर रविवार दि.२२ रोजी सांयकाळी म्हसे गावापर्यंत पाणी पोहचल्याने या भागातील भागातील शेतकऱ्यांनी जल्लोष करीत समाधान व्यक्त केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.