नीरा नृसिंहपूर, ता. इंदापूर, (– प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार) : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा 19 वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ आज (गुरुवारी) सकाळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला. आगामी सन 2019-20 च्या 19 व्या गळीत हंगामासाठी राज्य शासन आदेश देईल त्या दिनांकास गळीत हंगाम सुरू करणेसाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.
या कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सांगितले की, “नीरा-भीमा कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे.आगामी गळीत हंगामावर दुष्काळाचे संकट आहे, त्यामुळे गळीत हंगामात जास्तीत जास्त उसाचे गाळप होणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे.मागील गळीत हंगामामध्ये कारखान्याने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन रु.2601 याप्रमाणे चांगला दिलेला आहे, असेही अध्यक्ष पवार यांनी सांगितले.यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार यांना हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाच्या संदर्भाचा उल्लेख करीत असताना भाषणामध्ये अश्रू आवरता आले नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणचे वातावरण गंभीर बनले होते.”
प्रारंभी प्रास्ताविक कार्यकारी संचालक धिरजकुमार माने यांनी केले. यावेळी संचालक उदयसिंह पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सत्यनारायणाची पूजा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व त्यांच्या पत्नी जयश्री झगडे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली.आभार कारखान्याचे संचालक अॅड.तानाजीराव देवकर यांनी मानले.