मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड आगार प्रमुख सतीश मालचे यांच्या मनमानी कारभारा मुळे व प्रवाशी जनतेला होत असलेल्या त्रासामुळे तसेच नुकत्याच झालेल्या बस अपघातातील जखमींना तातडीने मदत पोहचविण्यात असमर्थ ठरल्याने 2 नोव्हेंबर पासून अपघात ग्रस्त प्रवाश्यांचे नातलग व मुरबाड आगार प्रमुख यांच्यात संघर्ष सुरू होता. यात काहीही तोडगा न निघाल्याने मोहन आत्माराम सासे माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीं दक्षता पथक अधिकारी भोसले यांच्या समोर आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशी वैतागले आहेत तसेच त्यांचे लोकप्रतिनिधी बरोबर वागणे बरोबर नाही या बाबत चर्चा झाली. मात्र मोर्चेकऱ्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने ठाणे परिवहन मुख्य अधिकारी बोडके यांना त्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले व आपल्या मागण्या सांगितल्या.
.यावेळी त्यांनी चौकशी अंती कारवाईचे आश्वासन दिले होते. दिलेल्या निवेदनातील मागण्याचा विचार करून त्यांनी आगार प्रमुख सतीश मालचे याना मुख्यालयी बोलावून मुरबाड आगार सोडण्याचे आदेश दिले असल्याचे मोहन सासे याना भ्रमण ध्वनी द्वारे बोडके यांनी कळविले असून चौकशी अंती योग्य कारवाई होईल याची ग्वाही दिली असल्याने तूर्तास प्रवाशी व आगार प्रमुख यांच्यातील संघर्ष टळला आहे. आगार प्रमुख सतीश मालाचे यांच्यावर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.