नीरा नरसिंहपूर,इंदापूर : (प्रतिनिधी बाळासाहेब सुतार) – लुमेवाडी ( ता . इंदापूर ) येथील नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या दोन्हीही बाजूंचा भराव व दोन पिलर पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी दहा किलोमीटरचा वळसा घालून जाण्याची वेळ आली आहे. शासनाने हा बंधारा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व भाविकांनी केली आहे.
नीरा नदीवरील लुमेवाडी ( ता . इंदापूर ) व पंचवटी ( ता . माळशिरस ) यांना जोडणारा कोल्हापुर पद्धतीचा बंधाऱ्यावरील रस्ता एक महिन्यापूर्वीच्या पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. बंधाऱ्याच्या दोन्हीही बाजूंचा मुरमाचा असणारा भराव खरडून वाहून गेल्याने वीस फूट खोल व दोनशे फूट लांब खड्डा पडला आहे. तर यातील दोन पिलरही तुटलेले आहेत. त्यामुळे यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. नागरिकांना नाईलाजास्तव त्याच खड्ड्यातून पायी दळणवळण करण्याची वेळ आली आहे. त्यातच हे भरावच वाहून गेल्याने बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. बंधारा पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी व भाविकांनी केली आहे.