मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडीमुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेले नुकसानग्रस्त शेतकरी दुर्लक्षित झाले असून मुरबाड तालुक्यातून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
मुरबाड सह ठाणे कोकण विभागतील भात शेतीच्या नुकसानीला राष्ट्रपती राजवटीत तुरळक मदत करून शेतकऱ्यांची थट्टा करून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक पातळीवर राजकीय कार्यकर्ते तहसीलदार वर्गाला निवेदन देऊन योग्य भाव देण्याची मागणी करत असताना शेतकऱ्यां बाबत उदासीनता दिसत असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकिय घडामोडी मुंळे शेतकरी वर्गाचे प्रश्न सर्वच स्तरातून दुर्लक्षित झाल्याने ओल्या दुष्काळा बरोबर राजकिय संकटाने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. कृषी विभाग,तलाठी,ग्रामसेवक या शासकीय यंत्रणा अजूनही पंचनामे करत असून शेतकऱ्याच्या नुकसानीचे दावे बनवत असताना राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाटकाचा परिणाम शेतकऱ्याच्या पीक नुकसान भरपाई मिळण्यावर होत असल्याने सरकार बनवण्यासाठी मतदान करणारे मतदार आता या खेळामुळे त्रस्त झाले आहेत. यातून आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदतीचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.