मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड माळशेज घाट मार्गावर बरखा पॉईंट जवळ माळशेज घाटात संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामात दगडगोटे वापरले जात असल्याचे समोर आले असून या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. निकृष्ट कामाला पाठीशी घालणाऱ्या या अधिकारी वर्गावर कारवाई करावी व हे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या या एंजन्सी कडून काम काढून घेण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात घाटात मोठया प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. तर वळणदार रस्त्या मुळे किरकोळ अपघात होतात व या अपघातात संरक्षण भिंतीचे नुकसान होते. त्यामुळे घाटात बारामहिने काहींकही कामे सुरू असतात. त्यामुळे या कामात अधिक नफा मिळवण्यासाठी अधिकारी वर्ग व ठेकेदार संगनमताने थातुरमातुर काम करून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळतात. त्यामुळे माळशेज घाटा सारख्या संवेदनशील महामार्गावर निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. कल्याण माळशेज नगर मार्गावरील अनेक तांत्रिक बाबी मुळे अपघाताचे प्रमाण वाढले असताना माळशेज घाटातील संरक्षण भिंतीच्या निकृष्ठ कामा मुळे आणखी आपघात होऊ शकतात अशी शक्यता प्रवासी व वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.