पिंपरी पेंढार ता.जुन्नर : (प्रतिनिधी,अशोक डेरे) – पिंपरी पेंढार व परिसरातील अनेक शेतकऱयांनी यंदा टोमॅटोचे पीक घेतले आहे. चालु वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन मोठ्या प्रमाणात खर्च, मेहनत, नवतंत्रज्ञान वापरून मोठया अपेक्षेने टोमॅटो पिक घेतले व ते आता काढणी योग्य होऊन ही कोसळलेले बाजारभाव व मागणी नसल्याने अनेक शेतकऱयांनी त्यांच्या लाखो रुपये खर्चून काबाडकष्ट व चिकाटीने अहोरात्र कष्ट करीत उत्तम टोमॅटोचे पीक घेतले परंतु सध्या कोरोना आजाराची दहशत व असणाऱ्या दीर्घकालीन संचारबंदी व भावातील मंदीमुळे दीड एकरातील तयार टोमॅटो पीक जागेवरच सोडून द्यावे लागल्याची खंत पिंपरी पेंढार येथील शेतकरी श्रीकांत भिवाजी खर्गे यांनी सा.समाजशिलशी बोलताना व्यक्त केली.
या पिकासाठी खर्गे यांनी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग पासरविणे, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, काठी, डाम, तार, हा सर्व खर्च एकरी कमीतकमी दीड लाख रुपयांपर्यंत होत असल्याचे सांगितले. टोमॅटो पीक कमी दिवसांत जास्त नफा देऊन जाणारे पीक असल्याने अनेक शेतक-यांचा हे पीक घेण्याकडे काळ असल्याचे पाहावयास मिळते.जुन्नर तालुक्यात हजारो एकरवर टोमॅटो पिकाची लागवड झाली आहे. अतिशय मेहनत करून शेतकऱ्यांनी चांगले पीक तयार केले परंतु तयार टोमॅटोचा ना होणार उठाव व बाजारभाव दीर्घकाळ मंदीत आल्याने शेतकऱ्याच्या हातात एकही रुपया पडत नाही याकारणास्तव शेतकरी हताश होताना मेटाकुटीस आला असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.