भीमाशंकर,पुणे : ( सीताराम काळे,सा.समाजाशील वृत्तसेवा) – पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमागार्ची भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यासाठी पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्हाधिका-यांना विशेष भूसंपादन अधिकारी नेमण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र हे काम सुरू होण्या आधीच काहि लोकांनी चुकिचे गट नंबर देऊन जमिनीच्या खरेदी विक्रीचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे महारेलकडून जो पर्यंत अधिकृत यादी येत नाही तो पर्यंत कोणीही अशा लोकांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
ब्रिटीशांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या पिंक बुक मध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी गेली १५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे या प्रकल्पासाठी सकारात्मक असून राज्य शासन त्यांच्या वाटयाच्या खर्चास मंजुरी देईल असा विश्वास् आहे. या प्रकल्पाचा महत्वाचा भाग असलेल्या भूसंपादन प्रक्रियेस आता प्राथमिक स्तरावर सुरुवात झाली आहे.
महारेलने निश्चित केलेल्या रेल्वे मार्गा नुसार भूसंपादन होईल. भूसंपादना करताना निर्माण होणा-या प्रश्नातून यामध्ये बदल देखिल होवू शकतो. भूसंपादनापोटी शेतकरी बांधवांना योग्य व चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी नागरिकांनी अडथळा निर्माण न करता शासनाला सहकार्य करावे. या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पायाभूत सर्व्हे, ड्रोन सर्व्हे व इतर सर्व अडथळे पार करण्यासाठी मी नेहमीच जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुसंपादनात शेतक-यांना काहि अडचणी वाटल्यास माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन ही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
नाशिक जिल्हया बरोबर पुणे जिल्हयात काहि बहाद्दरांनी उलटे पालटे उद्योग सुरू केलेत. अनेक लोक गट नंबर सर्व्हे नंबरची विचारणा करत आहेत. मात्र जो पर्यंत मोजणी पुर्ण होत नाही, त्याच्या सुनावण्या होत नाहीत, अंतिम नकाशा जाहिर होत नाही तो पर्यंत कोणताही जागा निश्चीत समजू नये व आपली होणारी फसवणूक टाळावी असे आवाहन देखील आढळराव पाटील यांनी केले आहे.