अलिबाग,रायगड : इतिहासामध्ये कायम अभेद्य आणि अजय राहीलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर रविवारी राष्ट्रध्वज फडकवीण्यात आला. स्वतंत्र्यानंतर जंजीरा किल्ल्यावर प्रथमच तिरंगा फडकवला जात असल्याने येथे शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमींनी एकच गर्दी केली होती. जंजीरा किल्ल्याच्या उंच भागात असलेल्या ध्वजस्थंभावर हा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. खासदार छत्रपती संभाजीराजे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, पुरातत्व मुख्य अधिकारी बीपिनचंद्र नेगे, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी आणि शिवभक्तांची या दिमाखदार सोहळ्यास उपस्थित होते.
पारंपारीक वेशभुषा, ढोल ताशे घेऊन शिवप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. अबालवृध्द महीलांनी उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमातेचा जयजयकार करीत या सोहळ्याचा आनंद द्विगुणीत केला.पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पुरातत्व विभागाकडे ध्वजारोहण करण्या संदर्भात परवानगीसाठी अनेक वर्षापासुन पाठपुरावा सुरू होता. यानुसार जंजीरा किल्ल्यावर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकविण्यास केंद्रीय पुरातत्व विभागाने मंजुरी दिल्यानंतर हा ध्वाजारोहण समारंभ पार पडला आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)