शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील मोठे गाव व १७ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या कवठे येमाई ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल दि. १३ ला सायंकाळी ५ ला समाप्त झाला. ५ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी १२ जागांसाठी उद्या दि. १५ होणाऱ्या मतदानानंतर निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे आता उभ्या असलेल्या सर्वच व विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांना मतदानाचे वेध लागले आहेत.
गावातील प्रत्येक वार्डात शांततेत व खेळीमेळीत प्रचार झाल्याची माहिती मिळत असून प्रत्येक उमेदवाराने आपापल्यापरीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. गावात विविध पॅनल मधून उमेदवार आपले भवितव्य अजमावत असून अनेक ठिकाणी एकास एक उमेदवार लढत देत आहेत. निवडणुक मतदानासाठी निवडणूक यंत्रणा ही सज्ज झाली असल्याचे दिसत आहे. उद्या दि. १५ ला होणाऱ्या मतदानानंतर दि. १८ ला मतमोजणी झाल्यावरच चित्र स्पष्ट होणार असल्याने निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते यांची धाकधूक तोपर्यंत सुरूच राहणार आहे.