मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : ठाणे जिल्ह्यातील बिगर आदिवासी भूमिहीन वन विभागाच्या लागवडयुक्त जमिनीवर पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे वनपट्टे करावे या मागणीचे निवेदन मुरबाड येथे कार्यक्रमासाठी आलेले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले याना आरपीआय सेक्यु चे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी दिले. या वेळी दिलेल्या निवेदनात वनहक्क दावा अधिनियम 2005 सुधारित 2008 नुसार आवश्यक पुराव्या सह दावे दाखल केले आहेत. मात्र हे दावे गेल्या अनेक वर्षा पासून जिल्हाकमिटी कडे प्रलंबित आहेत. यात मुरबाड तालुक्यातील अनु.जाती चे 91, आगरी समाजाचे 201, कुणबी समाजाचे 411 दावे प्रलंबित आहे. यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.
मुरबाड तालुक्यातील पाडाळे धरणग्रस्त प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने, बिगर शेती आदिवासी भूमिहीनांना न्याय देण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली. मी शेतकरी असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत पुढील आठवड्यात तात्काळ या विषयावर मिटींग लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे या बाबत आशावाद निर्माण झाला आहे. यावेळी काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे चेतनशिंह पवार आरपीआय सेक्यु.चे युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, दिलीप धनगर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, लक्ष्मण खोळंबे मुरबाड तालुकाअध्यक्ष, किशोर गायकवाड सरचिटणीस, अँड. निखिल अहिरे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.