गणेशवाडी ता. इंदापूर येथे अॅट्रासिटी कायद्या संदर्भात समाज प्रबोधन करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक ममता नंदा-गवळी
नीरा नरसिंहपूर,पुणे : भारतातील प्रत्येक नागरीकास संविधानाने आपले हक्क व अधिकार बहाल केलेले आहेत. त्याचा पुरेपूरे उपभोग घेण्याचा अधिकार संविधानाने घालून दिलेला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी समाजाने शिक्षण घेणे आवश्यक असून त्यामुळे समाजावर अन्याय होणार नसल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक ममता नंदा-गवळी यांनी केले.
गणेशवाडी ( ता. इंदापूर ) येथे अनुसूचीत जाती व जमाती अत्याचारक कायद्याची माहिती समाजाला होण्यासंदर्भात नागरी हक्क संरक्षण समीतीच्या कार्यक्रमात ममता नंदा-गवळी बोलत होत्या. यावेळी आशा सेविका रफिया तांबोळी, मदतनीस बशीरा तांबोळी, बहुजन क्रांती सेनेचे गणेश साठे, मोहन खंडागळे, पोलीस पाटील किरण खंडागळे, मल्हारी लोखंडे, राजेंद्र गायकवाड, लक्ष्मीबाई खंडागळे, अलका खंडागळे, महादेव मोहिते, पिडीत कुटूंबातील बाळू भोसले, शकुंतला भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.
नंदा गवळी पुढे म्हणाल्या की, समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारास खुप मोठ्या प्रमाणात आपणच जबाबदार असून त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यात असलेला शिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. घरची महिला शिकली तर संपुर्ण घर शिकते. शिक्षणाची गंगा सावित्रीबाई व महात्मा फुलेंनी दारोदारी आणली. शिक्षणामुळे आपले सर्व अधिकार आपणास कळतात. आंतरजातीय विवाह करण्यासाठी जाती तोडून विवाह करणे आवश्यक आहे. जोपर्यत जाती बाहेर जाऊन विवाह होणार नाहीत तोपर्यत अन्याय अत्याचार कमी होणार नाहीत. आपल्या हक्कासाठी आपण जागृत असणे आवश्यक आहे. स्वता सक्षम होण्यासाठी शिक्षण ही काळाची गरज आहे. आपली परस्थिती बदलायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे. मागासलेल्यांना हजारो वर्ष शुन्य टक्के आरक्षण होते. त्यामुळे त्यांची परस्थिती चांगली होत नाही तोपर्य़त आरक्षण ठेवण्यात येईल. बाबासाहेबांनी कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाहीत अशाच प्रकारचे संविधान निर्माण केले आहे. आजही भारतातील 65 ते 70 टक्के लोक शेतीवर जगतात. परंतू 30 टक्के लोकाकडे शेती असून बाकीच्या लोक शेतमजूर म्हणून जगतात. भारतीय संविधानाने न्याय, समानता व स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. देशात लग्नाच्या 3 ते 5 वर्षाच्या कालावधीत दीड लाख महिला मारल्या जात असल्याची नोंद पोलीसात आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी समाज सावकारकीच्या विळख्यात अडकला असून शिक्षणाच्या अभावामुळे अन्याय अत्याचाराचे प्रमाण देखील वाढले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण खंडागळे यांनी सुत्रसंचालन मोहन खंडागळे यांनी आभार रफिया तांबोळी यांनी मानले.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,निरा नरसिंहपूर)