कवठे येमाईत श्री स्वामी समर्थ सेवा बालसंस्कार केंद्राचे काम कौतुकास्पद – बाल वयात विनामूल्य संस्कार देण्याचे कार्य 

365
         
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आषाढ शुद्ध पंचमीचे औचित्य साधत आज दि. ०३ ला रविवारी दिंडोरी प्रणित आखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्र कवठे येमाई तालुका शिरूर यांच्या वतीने येथे सुरु असलेल्या बाल संस्कार केंद्रात दर्भ,मधाच्या साहायाने केंद्रात उपस्थित बालकांच्या जिभेवर ऐंन काढण्याचा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात सुमारे ५५ बालके,माता पालक सहभागी झाले होते.
             कवठे येमाई ग्रामपंचायत सभागृहात आज रविवारी आयोजित या बालसंस्कार केंद्रात प्रारंभी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना,गायत्री मंत्रोपचार,योगासने व मुलांनी स्वामींचे दर्शन कसे घ्यावे,ध्यानधारणा कशी असावी याबाबत उपस्थित सेवेकरी यांनी प्रत्यक्ष कृतीतुन बालकांना समजेल अशा पद्धतीने मार्गर्दर्शन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ केंद्र कवठे येमाई च्या निष्ठावंत,स्वामीभक्त सेवेकरी माधुरी बबनराव जाधव,मीना अरुण रोकडे व नंदा अशोक माते यांनी केंद्रात उपस्थित बालकांना दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक असलेली स्तोत्रे,श्लोक,प्रार्थना,ईश्वर आराधना याचे उत्तम मार्गदर्शन केले. तर स्वामी समर्थ सेवा केंद्र कवठे येमाई यांच्या वतीने येथील प्राथमिक शाळेत देखील बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
           यावेळी शिक्रापूर येथील बाल संस्कार केंद्राच्या प्रतिनिधी पूनम महाजन,प्रीती शिंदे,सचिन शिंदे,सचिन उशीर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. परिसरातील बालकांना सुसंस्कार घडावेत म्हणून श्री स्वामी समर्थ केंद्र कवठे येमाई यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या संस्कारक्षम उपक्रमाचे विधायक कामात नेहमीच अग्रेसर राहणारे गावठाणातील ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे,शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ.कल्पनाताई पोकळे यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच मंगलताई रामदास सांडभोर,ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी,रितेश शहा, शिक्षक बंधू भगिनी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे यांनी मुलांसाठी खाऊ म्हणून दिलेल्या ३५० भिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *