मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील गणेशपूर (मोरोशी) येथील रास्त भाव दुकानात प्लास्टिक तांदूळ ग्राहकांना मिळाल्याची तक्रार आदिवासी बांधवानी मुरबाड तहसिलदार संदीप आवार यांच्याकडे केली होती. याबाबत रिपाइं आठवले पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांनी मुरबाडचे तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेउन लेखी निवेदन दिले होते. त्यांना या कथित प्लास्टिक तांदूळ भेसळीबाबत सखोल चौकशी करून आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जर खेळ होत असेल तर रिपाइं (आठवले) पक्ष आंदोलन करेल असा इशारा दिला होता. मात्र मुरबाड तहसीलचे नायब तहसीलदार मोडक यांनी ‘ती’ प्लास्टिक तांदूळ विक्री ही अफवा असून मी त्या तांदळाची खिचडी खाल्ली आहे. मला काहीच झाले नाही असी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदिवासीं बांधवांनी केलेल्या तक्रारीची अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अहवाल आला नसतानाही एका अधिकाऱ्याने असे जाहीर केल्याने तो अहवाल तात्काळ प्रसिद्ध करा अशी मागणी करीत तहसीलदार कार्यालयावर रिपाइं आठवले पक्षाने हल्लाबोल केला. या वेळी एफ.डी.चा अहवाल तात्काळ सादर करून ते तांदूळ नेमके कोणते आहेत याची माहिती प्रसिद्ध करावी असे लेखी निवेदन तहसीलदार संदीप आवारी यांना देण्यात आले. या प्रसंगी रिपाइं तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, उपाध्यक्ष सय्यदभाई शेख, दयानंद रातांबे, लक्ष्मण भांडे, सचिव कांचन उघडे, संघटक पप्पू उघडे, सुधाकर शेळके, विद्यार्थी संघटनेचे संतोष उघडे, विक्रम गायकवाड, केशव भोंडीवले,भगवान भालेराव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
” याबाबत तहसीलदार संदीप आवारी यांनी माहिती देताना सागितले की, “मोरोशी गणेशपूर येथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, या तांदळाचे नमुने अन्न व औषध विभागाकडे पाठविले असून, अजुन अहवाल प्राप्त झाला नाही”