चोरट्यांचा वखारीतील कांद्यावर डल्ला – वखारीतून सुमारे १५ पिशवी कांद्याची चोरी – टाकळी हाजींच्या टेमकर वस्तीतील घटना 

458

        टाकळी हाजी,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात घरफोडी,कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषी साहित्याची दुकाने चोरटयांनी फोडल्याच्या घटना ताज्या असतानाच व या गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच आता टेमकर वस्ती येथील शेतकऱ्याच्या वखारीतून कांद्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.
टेमकर वस्तीतील म्हसेफाटा येथे चारीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश लोखंडे यांच्या वखारीतून रात्रीचे चोरट्यांनी सुमारे १५ पिशव्या कांदे चोरून नेले आहेत.त्यामुळे लोखंडे यांना अठरा ते वीस हजार रुपयांचा नाहक फटका बसला आहे. ही घटना दि. १५ च्या रात्री घडली. यापूर्वी शेतातून कांदे काढून नेणे,भरलेल्या पिशव्या उचलून नेणे, डाळिंबाच्या बागेतून डाळिंब तोडून नेणे असे प्रकार घडलेले आहेत.परंतु आता वखारीतून मोकळे कांदे भरून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये आता भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
आधीच अवकाळी पावसाचा तडाखा,त्यातून पालेभाजी,पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाचे पडलेले बाजार भाव, सातत्याने असलेली बिबट्यांची दहशत या समस्यांनी हैराण झालेला शेतकरी अनेक संकटांशी सामना करीत उभारी घेत असतानाच त्यांच्या कष्टावरच डल्ला मारला जात असल्याने हताश झाल्याचे लोखंडे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
शिरूरच्या बेट भागातील घरफोडी,कृषी पंप चोरी, केबल चोरी ,शेतमाल चोरी अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून या चोरांना आळा कधी बसणार ? जोपर्यंत यातील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तो पर्यंत हे सत्र असेच सुरू राहणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *