शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील मलठणच्या दंडवते माळ्यानजीक काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज वाहिनीचा धक्का बसल्याने सात शेळ्यांचा तर दोन मेंढ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने शेतकरी उत्तम गोडसे रा.मलठण हे या घटनेत बचावले.या घटनेत गोडसे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मलठण येथील गोडसे हे शेतकरी आपल्या शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेले होते. सायकांळी सहाच्या सुमारास ते शेळ्या घरी घेऊन जात होते. यावेळी प्रवाहित वीज वाहिनीचा धक्का ९ शेळ्या व २ मेंढ्या यांना बसल्याने शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. शेळ्या जागीच पडल्याचे पाहिल्यानंतर गोडसे हे सावध झाले. ते पुढे गेले नाहीत, त्यामुळे ते बचावले. त्यांनी ही माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थांना दिली. त्यानंतर महावितरणला माहिती देऊन तेथील वीज प्रवाह खंडित करण्यात आला.
– सुमित जाधव – उपकार्यकारी अभियंता,महावितरण,शिरूर
– “तालुक्यातील मलठण येथे घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावर आजच भेट देत पहाणी करणार असून घटनेचा पंचनामा केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्या कामी प्रस्ताव सादर करणार असून शासन नियमाप्रमाणे संबधीत शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे”.