लंडन- मालिका यापूर्वीच गमावलेल्या भारतीय संघासाठी इंग्लंडचे शेपूट पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही डोकेदुखी ठरले. 7 बाद 198 वरून इंग्लंडने दुसऱ्या दिवशी तब्बल 134 धावांची भर घातली. 332 धावांपर्यंत मजल मारत यजमानांनी भारताचे “डेड रबर’ जिंकण्याचे मनसुबे निम्मे तरी निकालात काढले.
वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करून प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवतात आणि मग डाव संपवण्याची अपेक्षा असताना शेपूट वळवळते. दुसऱ्या दिवशी हेच घडले. 7 बाद 181 वरून तळातल्या फलंदाजांना हाताशी धरत बटलरने अंत पाहिला. त्याच्या 89 धावा इंग्लंड संघाला तारून गेल्या. चहापानाला भारतीय फलंदाजांनी 1 बाद 53 धावा जमा केल्या होत्या.
खेळ चालू होताना इंग्लंडच्या उरलेल्या तीन फलंदाजांना बाद करायला भारतीय गोलंदाज सापळा रचणार होते. पहिल्या दिवस्पोर्ट शीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चेंडू जरा चांगला बॅटवर यायला लागला. बटलरने इतर फलंदाजांप्रमाणे टुकूटुकू फलंदाजी केली नाही. विराटने क्षेत्ररचना पांगवून मोठी चूक केली. बटलरने मोकळ्या जागेत चेंडू मारून धावा पटापट जमा केल्या. बुमराने रशिदला बाद केल्यावर ब्रॉडने बटलरला उत्तम साथ दिली. पहिल्या दोन तासांच्या खेळात इंग्लंडने 100 पेक्षा जास्त धावा वाढवून अडचणीतून मार्ग काढला. भारतीय गोलंदाजांनी खूप वेळा फलंदाजांना चकवले; पण नशिबाने चेंडू बॅटची कड काही घेत नव्हता.